सडकेवर

दादांच्या कॉलेजचा प्रसंग वाचल्यानंतर बऱ्याच जणांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. पुढे लिही असं प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी. त्यातून मग पुढचा प्रसंग लिहावा असा विचार मनात आला. दादांकडून तो विचारून घेतला. एक दिवस संध्याकाळी बसलो दोघं जण आणि त्यांना म्हटलं बोला. दादा सांगू लागले. 
 

” पैशाची अडचण आल्याने सिडनहॅम कॉलेजला ऍडमिशन न घेता थोरांदळ्याला यायची वेळ आली. माझ्या नशिबाने त्याच वर्षी मंचरला कॉलेज सुरु झाले होते. मंचर कॉलेजला पुढच्या वर्षी जाऊ असा विचार होता डोक्यात. त्यासाठी पैसे जमवायला सडकंवर कामाला जाऊ लागलो. तिथं कामाची काय पद्धत आहे हे गेल्याशिवाय कळणार नव्हतं. एक दिवस भाकरी बांधुन गेलो. त्या कामावर त्या वेळेस वसंत पाटिल (ह्यांची आणि दादांची नंतर फार चांगली मैत्री झाली) मुकादम होते. ते म्हणाले, ” आपल्याकडं काम कर तू.” फार नंतर मग वसंत पाटिल मला आदरार्थी संबोधू लागले. 

मग काय मी कामाला सुरुवात केली. दुपारी सुट्टी झाली तेव्हा जेवलो आणि संध्याकाळी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत आलो कामावर. कामावरच्या आया बायांनी मला पाहिलं आणि म्हणाल्या, ” ए बाळा तू आजयं आला रं?”
मला प्रश्न पडला की त्यांना कसं सांगायचं. वेळ मारून न्यायला मी म्हटलं, ” आलोय असाच. सुट्टीये मंग करावं काम म्हटलं.”
“बरं कर कर कर!!” असं त्या म्हणाल्या. नाही म्हटलं तरी माझ्याविषयी सहानुभूती होती. माझी आई गेली होती आणि शाळेतही  थोडा चांगला होतो मी. त्यामुळे लोक थोड्या प्रेमाने वागवायचे मला. कामावर असताना मग घमेलं भरताना त्यात दोन खोरी कमी टाकणार, धावपळीच्या ठिकाणी मला ठेवणार नाहीत हे असं सहकार्य मला मिळत राहिलं. 


दुपारच्या जेवायच्या सुट्टीपर्यंत पोटात भुकेची आग पेटलेली असायची. जवळ कुठे सावली नसायची.आम्ही सगळे एका पानं गळून पडलेल्या बाभळीच्या झाडाला आमची डब्याची गाठोडी बांधत असू. त्या वेळेस कसले स्टीलचे डबे आले. एका फडक्यात भाकरी आणि चटणी बांधून मी नेत असे. उन्हात कोळून भाकरी पार कडक होऊन जाई. मग ताकद लावायची आणि चुरायची पितळीमध्ये. कालवण घेतलं की वाळलेली भाकरी ते पटकन शोषून घ्यायची. मग दुसऱ्या कोणाचं तरी घ्यायचं आणि पुन्हा जेवायला सुरुवात. एक पितळी सहज जायची. 


जेवायच्या वेळेपर्यंत धुळीतच काम केलेलं असायचं. ती धूळ सगळी पायावर साचत असे. त्या वेळेस पाण्याचा सुद्धा प्रचंड तुटवडा असे. मग कसलं पाय धुणं आणि कसलं काय. तसंच आम्ही जेवायला बसत असू. मांडी घालून बसलं की पोटरी आणि मांडीच्या मध्ये घाम यायचा. आणि घाम आलाय हे कळायचं पण त्याचं काही वाटत नसे. उठून उभं राहिलं की पोटरी आणि मांडीला एक त्रिकोणी पट्टा येई. तो सुकला की आधीच पायावर असलेल्या धुळीने बुरशी आल्यासारखं दिसत असे. पण त्याचं काही वाटत नसे. संध्याकाळी घरी गेल्यावर हात पाय धुवेपर्यंत एखादा दागिना मिरवावा असा तो त्रिकोणी पट्टा लोक मिरवत असत. 


या कामावर असताना साहेब कधी येतो याची सगळे वाट पाहायचे. का?? तर तो आला की आपण त्याला काम  करताना दिसलं पाहिजे. नाहीतर काम जाईल याची भीती असायची. हजेरीवाला माणूस लक्ष ठेवायचा आणि काम नाही केलं की खाडा मांडीन अशी धमकी द्यायचा. तो आपल्याकडून जास्त काम करून घेतोय हे लवकरच लक्षात आलं माझ्या आणि त्याचा उलगडा पगाराच्या दिवशी झाला. पगाराच्या दिवशी भलतीच ४-५ माणसं येऊन रांगेला ऊभी राहिली. आमच्या अगोदर त्यांची नावं पुकारली गेली. इतर कोणी काही बोलत नसे. पण मी थोडा शिकलेला असल्याने मला उत्सुकता होती. त्यांनी आपापले पैसे घेतले आणि बाजूला जाऊन साहेबाला त्याचा वाटा काढून दिला. आणि गायब झाले. कामाला २० माणसं असायची पण हजेरीपटावर ३० लोकांची नावं यायची. नंतर कधीतरी त्या साहेबाला नोकरीवरून काढून टाकल्याचं मला कळलं.

या कामादरम्यान एक दिवस मी रांजणीला रेशनची साखर आणायला गेलो. आणि आधीच्या प्रसंगामध्ये सांगितलेले मारुती भिमाजी भोर मला तिथे भेटले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं मंचर कॉलेजला ऍडमिशन झालं आणि मी काम सोडून दिलं. हे काम कष्टाचं होतं. घरी गरीबी होतीच पण कष्टाशिवाय पर्याय नाही हा धडा मात्र मला या कामावर मिळाला.”

पुढचे कॉलेजचे प्रसंग आठवतील तसे तुला सांगत जाईन असं म्हणून दादा थांबले. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.