पुण्याहून बसने आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. नेहमीच्या हॉटेलात गेलो तर तिथे केबल नसल्यामुळे की अजून काहीतरी प्रॉब्लेम असल्याने मॅच दिसत नव्हती. मग विचार केला दुसरीकडे थांबू. हॉटेल शोधत फिरायला लागलो.बरीच हॉटेल्स फिरलो. त्या दिवशी का कोण जाणे कोल्हापुरात मॅच दिसतच नव्हती. शेवटी कोल्हापूरच्या आमच्या एका वर्गमित्राला फोन केला. त्याने एक दोन हॉटेल्सची नावं सांगितली. तिथे गेलो तर तिथेही मॅच दिसेना. इकडे भारताची बॅटिंग सुरू झाली .आम्ही अजून हॉटेलच शोधत होतो.बरीच पायपीट केली. एका ठिकाणी थांबून चहासुद्धा घेतला. मित्राने घरी फोन लावून स्कोअर विचारून घेतला. आज काही भारताची बॅटिंग बघायला मिळत नाही असा विचार करत आम्ही पुन्हा हॉटेल शोधायला सुरुवात केली. थोडं चालल्यावर एक बरं हॉटेल दिसलं. आमच्यातल्या एकाने आतमध्ये जाऊन मॅच दिसतेय का विचारलं. त्यांनी हो म्हणताच आम्ही आनंदात आतमध्ये गेलो. पटकन चेक इन करून रूममध्ये जाऊन मॅच लावली.
आमचं नशीब म्हणा किंवा अजून काही, त्यावेळी नेमका युवराज बॅटिंगला होता. त्याच्या आणि फ्लिन्टॉफच्या बाचाबाचीचा रिप्ले आम्ही पाहिला. शेवटच्या २ ओव्हर बाकी होत्या.एकोणीसावी ओव्हर सुरू झाली आणि युवराजने तडाखा सुरू केला. त्यानंतर पुढे युवराजने काय केलं हे सगळ्यांनाच माहीत आहे. नेमका त्याचवेळी रवी शास्त्री कॉमेंट्रीला होता. त्याची कॉमेंट्री युवराजच्या तडाख्याला अगदी चपखल अशी होती.
आम्ही शेवटच्या तीन ओव्हर्स पहायला मिळाल्या म्हणून आनंदात होतो.भारताने सामना आणि पुढे वर्ल्ड कपही जिंकला. हा सामना पाहण्याकरता कोल्हापुरात हॉटेल शोधत केलेली पायपीट, नेमकं युवराजने सहा सिक्स मारण्याअगोदरच हॉटेलवर पोहोचणे आणि अर्थातच युवराजचे सहा सिक्स या सगळ्यामुळे हा सामना माझ्यासाठी विशेष आहे.