आयटीसीच्या शेअरबद्दल चर्चा केली नाही असा इन्व्हेस्टर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. गेले अनेक महिने अनेक विश्लेषक, अनेक टीव्ही चॅनेल्सवाल्यांनी हा शेअर सुचवला आहे. अनेक रिटेल इन्व्हेस्टर्स हा शेअर चांगला आहे म्हणून छोट्या मोठ्या संख्येने हा शेअर घेऊन बसले आहेत. शेअर मात्र वाढता वाढेना!! सोशल मीडियावर तर हा शेअर मीम मटेरियल झाला आहे. आयटीसीचा शेअर ०.५% टक्के वाढला तरी सोशल मीडियावर मिम्जचा पूर येतो. या शेअरची खिल्ली उडवणारे आहेत तसेच या शेअरचे पाठीराखेसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. हा शेअर येणाऱ्या काळात ‘वेल्थ क्रिएटर’ ठरणार अशी आशा मनात ठेवून हे सगळे आयटीसी पाठीराखे आपले शेअर्स धरून बसले आहेत. पण नक्की परिस्थिती काय आहे? हे शेअर खरोखर इव्हेस्टर्ससाठी खरोखर चांगला आहे का?
या कंपनीची थोडीशी तोंडओळख करून घेऊ. कंपनीचे हेडक्वार्टर कोलकाता येथे आहे. ही कंपनी सिगरेट, FMCG, हॉटेल, पॅकेज्ड फूड, स्टेशनरी, आयटी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय करते. सिगरेट मार्केटमध्ये आयटीसी मार्केट लीडर आहे. त्यांचा हॉटेल बिझनेसही चांगला चालतो.
३१ डिसेंबर २०२० पर्यंत कंपनीचा ग्रॉस सेल – ७६,०९७ कोटी
३१ डिसेंबर २०२० पर्यंत कंपनीचा ग्रॉस प्रॉफिट – १५,१३६ कोटी
कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज – २०० हून अधिक
एकूण हॉटेल्सची संख्या – १०० हून अधिक
कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार –
सुरुवातीच्या जवळपास ६० वर्षांच्या काळात कंपनीने तंबाखू आणि सिगरेट व्यवसायावरच आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत उडी घेतली. आजमितीला कंपनीकडे २५ अतिशय नामांकित ब्रँड्स आहेत ज्यामध्ये आशीर्वाद, सनफिस्ट, यप्पी नूडल्स, बिंगो, बी नॅचरल, सॅव्हलॉन, क्लासमेट नोटबुक्स, मंगलदीप अगरबत्ती यांचा समावेश होतो. कंपनीची आयटीसी इन्फोटेक नावाची आयटी कंपनीसुद्धा आहे.
या ब्रँड्सबद्दल थोडं –
आशीर्वाद आटा – भारताचा पहिल्या क्रमांकाचा आटा ब्रँड – कस्टमर वर्षाला या ब्रॅण्डवर साधारण ६००० कोटी रुपये खर्च करतात
सनफिस्ट – भारताचा पहिल्या क्रमांकाचा प्रिमियम बिस्कीट ब्रँड – कस्टमर वर्षाला या ब्रॅण्डवर साधारण ४००० कोटी रुपये खर्च करतात
बिंगो – कस्टमर वर्षाला या ब्रॅण्डवर साधारण २७०० कोटी रुपये खर्च करतात
यप्पी नूडल्स – भारतातील टॉप २ नूडल्स ब्रँडमधील एक. कस्टमर वर्षाला या ब्रॅण्डवर साधारण १३०० कोटी रुपये खर्च करतात
क्लासमेट नोटबुक्स – नोटबुक सेगमेंटमध्ये मार्केट लीडर. कस्टमर वर्षाला या ब्रॅण्डवर साधारण १४०० कोटी रुपये खर्च करतात
मंगलदीप अगरबत्ती – धूप सेगमेंटमध्ये पहिला तर अगरबत्ती सेगमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड. कस्टमर वर्षाला या ब्रॅण्डवर साधारण ८०० कोटी रुपये खर्च करतात
सिगरेट बिझनेसवर अवलंबित्व –
आयटीसी कंपनी सिगरेट बिझनेसवर बरीच अवलंबून आहे अशी टीका अधूनमधून ऐकायला, वाचायला मिळते. कंपनी व्यवस्थापनालादेखील याची कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी हळूहळू त्यांनी FMCG आणि हॉटेल व्यवसायावर जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पॅकेज्ड फूड्स डिव्हिजनने गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी केली. या व्यवसायात सातत्याने होत चाललेली वाढ कंपनीसाठी आशयदायक आहे. पॅकेज्ड फूड्सचा बिझनेस अमेरिका, आफ्रिका, मिडल ईस्ट आणि ऑस्ट्रेलियामध्येदेखील वाढतो आहे. कंपनीने नुकतीच सनराईज फूड्स नावाची कंपनी विकत घेतली. त्यांची एमवेबरोबरही व्यावसायिक भागीदारी आहे ज्यातून त्यांनी जवळपास ७० नवे प्रॉडक्ट्स बाजारात आणले.
थोडंसं कंपनीच्या आर्थिक स्थितीविषयी –
कंपनीचे बाजार भांडवल जवळपास २.५० लाख कोटी रुपये एवढे आहे.
कंपनीचे स्टेकहोल्डर्स –
एलआयसीचा – २४.२३%
टोबॅको मॅन्युफॅक्चरर्स इंडिया लिमिटेड – २४.२३%
इंश्युरन्स कंपन्या – २१.५७%
एफपीआय – १३.३१ %
म्युच्युअल फंड – ९.३५%
फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन्स – ८.०१%
कंपनीचा PE – १८.२४
इंडस्ट्रीचा PE – ७४.१२
एवढ्या विविध क्षेत्रांमध्ये एकाचवेळी बिझनेस करत असूनही, वेळोवेळी मार्केट रिसर्च करून नवनवीन प्रॉडक्ट्स लाँच करत असूनही ही कंपनी डेट फ्री आहे. याशिवाय चांगला डिव्हीडंड देणाऱ्या मार्केटमधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आयटीसीचा समावेश होतो.
लॉकडाऊनमुळे कंपनीच्या सिगरेट आणि हॉटेल बिझनेसला मोठ्या प्रमाणात फटका बसला. मात्र याचवेळी FMCG बिझनेस जवळपास १६% ने वाढला. या बिझनेसमधील अनेक प्रॉडक्ट्सचे मॅन्युफॅक्चरिंग जवळपास १००% नी वाढले आहे. या बिझनेसमधले मार्जिन येणाऱ्या काळात वाढत जाईलअसे कंपनीचे म्हणणे आहे.
डीमर्जर होणार का?
गेल्या काही दिवसांपासून बाजारात आयटीसीच्या डीमर्जरची बातमी फिरत आहे. काही जणांच्या मते ही बातमी गेली अनेक वर्षे फिरत आहे आणि होत तर काहीच नाही. आयटीसीचा शेअर आहे तिथेच राहतो. मात्र खरोखर जर कंपनीने डीमर्जर केले तर ते कदाचित तीन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केले जाऊ शकते.
१. हॉटेल
२. आयटी
३. FMCG
अर्थात हे डीमर्जर करायचे की नाही आणि केले तर कधी करायचे हा निर्णय कधी होईल हे आत्ता कुणीच सांगू शकत नाही. असे म्हणतात की शेअर इन्व्हेस्टर्सची अक्षरशः परीक्षा बघतो. हे डीमर्जर झाले तर आयटीसीच्या शेअरहोल्डर्सचा फायदाच होईल हे मात्र नक्की.
हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यावा किंवा नाही याचा निर्णय मात्र ज्याने त्याने आपापल्या आर्थिक सल्लागाराशी बोलूनच घ्यायचा आहे.